मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले असून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढली असून पुढील काही दिवसही राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
हवामान विभागाने आज नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जून महिन्यात राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक भागांत अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण केली. दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राकडे त्याचा प्रभाव अधिक तीव्र होत असल्याने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणे भरली असून काही धरणांतून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून सध्या सुमारे ३७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, यापूर्वी दुपारी यंदातील सर्वाधिक ४३,५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post