नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याचा पहिलाच दिवस एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक ठरला आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तब्बल १९२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी घरगुती ग्राहकांना दरकपातीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीमध्ये १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १९२ रुपयांनी स्वस्त होऊन २,७३८ रुपयांवर आला आहे. पटणामध्ये त्याची किंमत ३,२२७ रुपयांवरून ३,०१८ रुपये झाली आहे. तर लखनऊमध्ये हा सिलेंडर ३,०५२.५० रुपयांवरून २,८६०.५० रुपयांवर उपलब्ध होणार आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग तसेच अन्य व्यावसायिक क्षेत्रांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
दुसरीकडे, उज्ज्वला योजनेतील काही लाभार्थ्यांसाठी मात्र ऑगस्ट महिन्यापासून एलपीजी महागणार आहे. १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान चार अनुदानित सिलेंडरचे रिफिल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना यापुढे ३०० रुपयांचे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना पुढील सिलेंडरसाठी सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणे पूर्ण किंमत भरावी लागणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच चालू आर्थिक वर्षापासून अनुदानाची मर्यादा चार सिलेंडरपर्यंत निश्चित केली आहे.
दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती कायम ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ९४१.५० रुपये आहे. बेंगळुरूमध्ये ९४४.५० रुपये, अहमदाबाद आणि गुरुग्राममध्ये ९४९ रुपये, जयपूरमध्ये ९५२.५० रुपये, चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये, कोलकात्यात ९६८ रुपये, लखनऊमध्ये ९७६.५० रुपये, तर हैदराबादमध्ये ९९४ रुपये इतका दर कायम आहे.
व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात कधी होणार, याकडे आता देशभरातील गृहिणी आणि सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post