नवी दिल्ली : केंद्र सरकारसोबत ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) द्विसदस्यीय शिष्टमंडळाने काल महत्त्वपूर्ण चर्चा केली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंग यांच्यासोबत CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी ही बैठक घेतली. आज या चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर प्रकरणांवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. जर सरकारने प्रधान यांच्या राजीनाम्यावर स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर या बैठकांना काहीच अर्थ उरत नाही, असे सणसणीत प्रतिपादन आशुतोष रांका यांनी केले आहे.
आशुतोष रांका यांनी माहिती दिली की, कालच्या बैठकीत सरकारने काही मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वासन दिले आहे. नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, त्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई आणि कायदेशीर कारवाईबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याचे मान्य केले आहे. आज होणाऱ्या दुसऱ्या फेरीतही यावर सखोल चर्चा अपेक्षित आहे. मात्र, CJP ची सर्वात मुख्य मागणी असलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा प्रश्न अद्याप अनिर्णित आहे.
एनटीएच्या (NTA) ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ
CJP च्या तीव्र आंदोलनाचा मोठा परिणाम म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमधील (NTA) तब्बल ४७ अधिकाऱ्यांना सेवामुक्त केले आहे. सरकारच्या या कृतीचे CJP ने कौतुक केले असले, तरी यामुळे मूळ प्रश्न सुटलेला नाही, असा दावा आशुतोष रांका यांनी केला आहे. प्रश्नपत्रिका फुटणे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या संपूर्ण प्रकरणाची अंतिम नैतिक जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची आणि शिक्षणमंत्र्यांचीच असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
सरकारला आंदोलनाचा कडक इशारा
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कॉक्रोच जनता पार्टी पूर्णपणे ठाम आहे. सरकारने या मुद्द्यावर वेळकाढूपणा केल्यास किंवा मागण्यांकडे कानाडोळ केल्यास, देशभरात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आशुतोष रांका यांनी सरकारला दिला आहे. आजच्या बैठकीच्या निकालावर पक्षाची पुढील रणनीती अवलंबून असणार आहे.















Discussion about this post