जळगाव । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त करत त्यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले मंत्री महाजन?

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, “एखाद्या विषयावरचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असेल तर अशा पद्धतीची भडक वक्तव्ये केली जातात. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही शंका नाही. त्यांच्या कुटुंबातील पंकजा मुंडे असतील किंवा इतर कोणी, कोणालाही शंका नाही. असे असताना मध्येच असे वक्तव्य करणे योग्य नाही,” असे महाजन यांनी म्हटले.
सध्या माध्यमांमध्ये ज्या विषयांची चर्चा सुरू आहे, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले गेले असावे, असा अंदाजही महाजन यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सध्याच्या पावसाच्या परिस्थितीवर बोलताना महाजन यांनी चिंता व्यक्त केली. अन्नधान्याचे उत्पादन कमी झाले तर बाहेरून धान्य आणता येऊ शकते; मात्र पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.“आपल्याकडे धान्याची गोदामे भरलेली आहेत. अन्नधान्य पिकले नाही तर धान्य कुठूनही आणता येईल. मात्र पाणी कुठून आणायचे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गणरायाला माझी हीच विनंती आहे की अजून वेळ गेलेली नाही; परतीचा चांगला पाऊस पडू दे,” असे साकडे गिरीश महाजन यांनी गणरायाला घातले.















Discussion about this post