मुंबई । नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणी गेल्या महिनाभरापासून राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधूंच्या वतीने भव्य जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आधी ठरल्यानुसार आज ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर या मोर्चाचे रुपांतर थेट विजयी जल्लोष सभेत करण्यात आले.
अंधभक्तांविरुद्ध देशभक्तांचा विजय: उद्धव ठाकरे
या जल्लोष सभेत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “मी देशातील सर्व देशभक्तांना अभिवादन करतो. हा विजय कोणत्याही एका निवडणुकीचा नाही, तर अंधभक्तांविरुद्ध देशभक्तांनी मिळवलेला हा मोठा विजय आहे. आता खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली असून हा संघर्ष ‘भाजप विरुद्ध भारत’ असा आहे.” पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “या संघर्षात देशातील जनता सर्व जात, पात आणि धर्म विसरून ‘होय, मी भारतीय आणि देशभक्त आहे’ या एकाच भावनेने एकत्र आली आहे.”
‘झुरळाने हुकूमशहाला नमवले’
कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर गेल्या महिन्याभरापासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन पेटले होते. या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “काल एका झुरळाने हुकूमशहाला नमवले, हाच खरा विष्णूचा अवतार आहे.”
या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती लाभली होती. सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.















Discussion about this post