जळगाव/मुंबई । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भीषण उकाडा वाढला असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यातील उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असून प्री-मान्सूनपूर्वीच नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा पुन्हा वाढला असून रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्याला मात्र वाढत्या तापमानापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
नंदुरबारमध्ये तापमानाची चाळिशी; रस्ते पडले ओस
नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान असलेला तापमानाचा पारा थेट ४० अंशांवर पोहोचला आहे. ‘अल निनो’च्या संकटामुळे येत्या काही दिवसांत हे तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने उष्माघात टाळण्यासाठी विशेष कक्षांची निर्मिती केली असून नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
रायगड जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’
कोकण पट्ट्यातील रायगड जिल्ह्यातही उष्णतेचा पारा सातत्याने चढत असून तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. कोकणातील ‘उष्ण आणि दमट’ हवामानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्री-मान्सून काळातील बदलत्या वातावरणामुळे कधी ढगाळ हवामान तर कधी तीव्र ऊन अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली असून, आजसाठी रायगडला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
जळगावकरांना मोठा दिलासा; पण ‘हा’ इशारा कायम!
एकदा जळगाव जिल्ह्यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या २४ तासांत जळगावच्या तापमानात तब्बल दोन ते अडीच अंशांची घट झाली आहे. ४२.६ अंशांवर असलेला पारा ४०.४ अंशांवर घसरल्याने वातावरणातील उकाडा कमी झाला असून जळगावकरांना मे हीटच्या तडाख्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा फार काळ टिकणारा नाही; कारण पुढच्या ३ ते ४ दिवसांत जळगावचे तापमान पुन्हा ४४ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.















Discussion about this post