जळगाव । आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर प्रत्येकी चार फेऱ्यांमध्ये विशेष गाड्या चालविण्यात येणार असून, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
यामध्ये नागपूर–मिरज विशेष (०१२०५/०१२०६) ही गाडी २३ आणि २४ जुलै रोजी नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी मिरजला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी २४ आणि २५ जुलै रोजी मिरजहून सेवा उपलब्ध असेल. या गाडीला भुसावळ, जळगाव, चाळीसगावळसह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
तसेच नवी अमरावती–पंढरपूर विशेष (०१११९/०११२०) ही गाडी २१ आणि २४ जुलै रोजी अमरावतीहून सुटेल, तर २२ आणि २५ जुलै रोजी परतीचा प्रवास करेल. या गाडीला भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबा असेल.
याशिवाय खामगाव–पंढरपूर विशेष (०११२१/०११२२) ही गाडी २१ आणि २३ जुलै रोजी खामगावहून सुटून २२ आणि २४ जुलै रोजी परत येणार आहे. या दोन्ही गाड्यांनाभुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकांवर थांबा देण्यात आला
भाविकांच्या अतिरिक्त सोयीसाठी भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष (०११५९/०११६०) गाडीही चालविण्यात येणार आहे. ही गाडी २४ आणि २५ जुलै रोजी भुसावळहून सुटेल, तर २५ आणि २६ जुलै रोजी पंढरपूरहून भुसावळकडे परतीचा प्रवास करेल. ही सेवा पूर्णपणे अनारक्षित असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
आषाढी एकादशीसाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असल्याने अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष गाड्यांमुळे खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, नियमित गाड्यांवरील गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे.















Discussion about this post