तामिळनाडूच्या राजकारणात मोठा राजकीय बदल घडवत अभिनेता-राजकारणी विजय (थलापती) आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहेत. व्हीसीके (VCK) आणि आययूएमएल (IUML) यांच्या पाठिंब्याने, थलपथी विजय यांचा पक्ष, टीव्हीकेने सरकार स्थापन केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने तीन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली.
मुख्यमंत्री विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खालील तीन मुख्य प्रस्तावांना मंजुरी दिली:
१. २०० युनिट मोफत वीज: तमिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
२. अमली पदार्थ विरोधी ‘स्पेशल टास्क फोर्स’:
राज्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्स तस्करीचे कंबरडे मोडण्यासाठी एका विशेष कृती दलाची स्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ‘ड्रग-फ्री तमिळनाडू’ हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
३. महिला सुरक्षेसाठी विशेष दल:
राज्यातील महिलांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणखी एक स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी हे दल काम करेल.
“मी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात करेन”
निवडणूक प्रचारादरम्यान विजय यांनी जनतेला शब्द दिला होता की, मुख्यमंत्री होताच मी वेळ वाया न घालवता कामाला सुरुवात करेन. आज शपथविधीनंतर त्यांनी आपल्या भाषणात या तीन निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमुळे तमिळनाडूच्या राजकारणात आणि प्रशासनात ‘थलपती’ स्टाईलने एका नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. मोफत वीज आणि कडक सुरक्षा या दोन प्रमुख मुद्द्यांवर भर देऊन त्यांनी पहिल्याच दिवशी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.














Discussion about this post