पुणे । UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक पुण्यात घडली. प्रथमेश दिलीप देशमुख असे मृत तरुणाचे नाव असून तो धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खासापुरी गावचा रहिवासी होता.
प्रथमेश हा मागील सुमारे आठ महिन्यांपासून पुण्यातील शनिवार पेठ परिसरातील पेपर गल्ली येथे राहत होता. त्याने UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. मात्र, या परीक्षांच्या पूर्व परीक्षेत त्याला यश मिळाले नव्हते. त्यामुळे तो काही काळापासून तणावात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
स्पर्धा परीक्षेतील अपेक्षित यश मिळत नसतानाच प्रथमेशसमोर आर्थिक अडचणीही वाढत होत्या. त्याच्यावर अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याच्या मूळ गावी सोयाबीनचे पीक नापिकीमुळे खराब झाले होते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली होती.या सर्व परिस्थितीचा प्रथमेशच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. तो पुन्हा स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करण्याऐवजी गावी परतण्याच्या विचारात असल्याचेही सांगण्यात आले.
खोलीत आढळली चिठ्ठी
घटनेच्या आदल्या दिवशी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास प्रथमेश आपल्या खोलीवर परतला. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यातील मजकुराच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
प्रथमेशच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई आणि चार विवाहित बहिणी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमेशने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा, अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती.दरम्यान, या घटनेची नोंद पुण्यातील नारायण पेठ पोलीस चौकीत करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीसह इतर बाबींची तपासणी करण्यात येत असून, या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.















Discussion about this post