जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे राबविल्या गेलेल्या ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. तब्बल ६०० हून अधिक शिक्षकांचे बोगस आयडी तयार करून शासनाचा कोट्यवधींचा पगार हडप केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) जळगाव माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी ११ शिक्षणाधिकाऱ्यांसह ४८ जणांना सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे.
हा घोटाळा २०१३ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत झाल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील काही शाळांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली. या भरतीला अधिकृत रूप देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून बनावट ‘शालार्थ आयडी’ जनरेट करण्यात आले.
ऑक्टोबर २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात येऊन १० शाळांची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे एसआयटीने तपासाची चक्रे फिरवली असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
याप्रकरणी ११ उपशिक्षणाधिकारी, ३ कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहायक अशा एकूण ४८ जणांची चौकशी केली जाणार आहे. १५ ते १८ एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय मंडळात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सलग चार दिवस चालणाऱ्या या सुनावणीत संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेल्या नियुक्त्या आणि मंजूर केलेले आयडी यांची पडताळणी केली जाणार आहे.















Discussion about this post