मुंबई । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. ठाणे न्यायालयाने त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुख्य सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्यामुळे 23 जुलै रोजी होणाऱ्या मुख्य सुनावणीपर्यंत विनायक राऊत यांना अटकेपासून कोणतेही संरक्षण मिळणार नाही. या कालावधीत पोलिसांना चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याचा अधिकार राहणार असल्याने राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर गुन्हा
विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात पती, सासरे आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी मानसिक आणि कौटुंबिक छळासह अनेक गंभीर आरोप केले आहेत.
गिरिजा राऊत यांनी तक्रारीत जबरदस्तीने अघोरी पूजेला बसवण्यात आल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी अघोरी पूजेचे आरोप फेटाळून लावले. “आम्ही त्या पंथाचे नाही आणि अशा प्रकारांना आमचा कोणताही पाठिंबा नाही. सत्य बाहेर येईल आणि न्यायदेवता न्याय देईल,” असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, ठाणे न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने आता पोलिसांकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 23 जुलै रोजी या प्रकरणावर मुख्य सुनावणी होणार आहे.














Discussion about this post