जामनेर । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर मार्गावर शालेय पोषण आहाराची वाहतूक करणाऱ्या ४०७ टेम्पोला अपघात झाला. धावत्या टेम्पोचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले. या अपघातात पोषण आहाराच्या गोण्यांवर बसलेल्या दोन हमालांचा वाहनाबाहेर फेकले गेल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृतांची ओळख जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४०७ टेम्पोमध्ये पाचोरा येथून शालेय पोषण आहाराच्या गोण्या भरून पुढील वितरणासाठी नेण्यात येत होत्या. या प्रवासादरम्यान दोन्ही हमाल टेम्पोतील गोण्यांवर बसले होते.शेंदुर्णी-पहूर मार्गावर टेम्पो पोहोचला असताना अचानक त्याचा टायर फुटला. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटले. अपघातात गोण्यांवर बसलेले दोन्ही हमाल जोरात बाहेर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न
या दुर्घटनेनंतर पोषण आहाराच्या वाहतुकीची पद्धत आणि कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मालवाहू वाहनात कामगारांना मालासोबत बसवून नेण्यात आले होते का, वाहनाची क्षमता आणि फिटनेस काय होता, तसेच संबंधित वाहनाचे परमिट व विमा वैध होते का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
शासकीय योजनेचा माल वाहून नेताना वाहतूक नियम आणि सुरक्षेच्या निकषांचे पालन झाले होते का, याचाही तपास आवश्यक ठरणार आहे. या वाहतुकीचे कंत्राट कोणाकडे होते, पोषण आहार कोणत्या केंद्राकडे नेण्यात येत होता आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघाताची नेमकी परिस्थिती, वाहनाची तांत्रिक स्थिती आणि वाहतुकीदरम्यान नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास सुरू आहे.















Discussion about this post