जळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागांत तापमानाचा पारा वाढला असून, नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून, १३ सप्टेंबरपासून जळगाव जिल्ह्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सकाळपासूनच जाणवणारा उकाडा आणि दुपारच्या वेळी वाढणारा उन्हाचा चटका यामुळे वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. त्यामुळे आता पावसाच्या पुनरागमनाकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, नाशिकचा घाटमाथा आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
राज्यातील पावसाच्या स्थितीत ११ सप्टेंबरपासून बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे सध्या वाढलेला उकाडा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश भागांत सध्या ढगाळ वातावरण आणि उन्हाचा लपंडाव सुरू राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडू शकतात. मात्र, अनेक भागांत पावसापेक्षा उघडीपच अधिक राहण्याची शक्यता आहे.
१३ ते १५ सप्टेंबरदरम्यान जळगावला दिलासा?
जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने १३ ते १५ सप्टेंबर हा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात जिल्ह्यात काही भागांत दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली असून, या कालावधीत अपेक्षित पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाल्याने ‘गणरायाच्या स्वागताला पाऊस हजेरी लावणार का?’ याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post