जळगाव /नवी दिल्ली : देशभरातील हवामानात मोठा बदल होत असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने ३० मे रोजी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह सुमारे १५ राज्यांमध्ये पावसासह चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. काही भागांत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आधीच वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर देशातील सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर तामिळनाडू किनारपट्टी आणि लगतच्या भागांवर मध्य-ट्रोपोस्फियर स्तरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने वातावरणात वेगाने बदल होत आहेत. यामुळे मान्सूनच्या आगमनालाही पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्रातही पावसाचा इशारा
दरम्यान, महाराष्ट्रातील उष्णतेची लाट आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील जळगावसह अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगावकरांना उष्णतेपासून दिलासा
हवामान विभागाने ३० मे ते १ जून या कालावधीत जळगाव जिल्ह्यासाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी पावसाचा हा अंदाज दिलासादायक असला, तरी वादळी वारे आणि विजांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post