महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एमपीएससीने राज्य सेवा (नागरी सेवा) परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ८७ जागांच्या तुलनेत आता तब्बल २६५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
एमपीएससीकडून याबाबत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून वाढीव पदसंख्येची माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. तसेच आयोगाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरूनही ही माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचवली आहे.
यापूर्वी केवळ ८७ जागांची घोषणा झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता जागांची संख्या जवळपास तिप्पट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढीव पदसंख्येमुळे अधिकाधिक उमेदवारांना शासकीय सेवेत संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुधारित पदसंख्येमध्ये प्रशासनातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः पोलीस उपअधीक्षक (DSP), गटविकास अधिकारी (BDO) तसेच विविध वर्ग-१ आणि वर्ग-२ संवर्गातील पदे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, यंदाही अनेक उमेदवारांच्या अपेक्षेप्रमाणे उपजिल्हाधिकारी पदाचा समावेश वाढीव जागांमध्ये करण्यात आलेला नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा मानला जात आहे. वाढलेल्या जागांमुळे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उमेदवारांनी वाढीव पदसंख्या आणि सुधारित जाहिरातीसंदर्भातील सविस्तर माहिती एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post