मुंबई । गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सूनच्या पुढील वाटचालीला वेग मिळत असल्याने हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी २४ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ परिसरात उष्ण लाटेची परिस्थिती राहू शकते. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २५ आणि २६ जूनदरम्यान मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई आणि कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.















Discussion about this post