मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने राज्यभरात वर्चस्व राखले असले तरी नाशिकमधील निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होऊन भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते विजयी झाल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित नेत्यांकडून सविस्तर माहिती मागविल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नाशिकची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावत नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र निकालात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी बाजी मारत सर्व राजकीय अंदाज फोल ठरवले.
या पराभवानंतर महायुतीतील मतांचे विभाजन आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः नाशिकमध्ये भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने मतदानाची दिशा आणि त्याचा निकालावर झालेला परिणाम याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
निवडणुकीपूर्वी गोकुळ गीते आणि गणेश गीते या गीते बंधूंनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी अनेक प्रयत्न केले. मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनीही त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र गोकुळ गीते यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही.
निकालानंतर आता नाशिकमधील मतदानाचे गणित, महायुतीतील समन्वय आणि स्थानिक नेतृत्वाची भूमिका यावर चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील पदाधिकारी तसेच मंत्री उदय सामंत यांच्याकडून पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी अहवाल मागविल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यातील इतर बहुतांश जागांवर महायुतीने विजय मिळवला असला तरी नाशिकमधील निकाल हा राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post