नवी दिल्ली: गेल्या १२ वर्षांपासून लोकसभेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या मोदी सरकारला आज ऐतिहासिक धक्क्याला सामोरे जावे लागले. केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी मानलेले ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेत बहुमताअभावी फेटाळले गेले आहे. विशेष म्हणजे, या विधेयकासोबतच मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयकही मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.
बहुमताचे गणित बिघडले; ५४ मतांनी घात केला
विधेयकावर झालेल्या मतदानावेळी लोकसभेत एकूण ५२८ सदस्य उपस्थित होते. घटनादुरुस्ती विधेयक असल्याने ते मंजूर करण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची (३५२ मते) आवश्यकता होती. मात्र, विधेयकाच्या बाजूने केवळ २९८ मते पडली, तर २३० सदस्यांनी विरोधात मतदान केले. १२ सदस्य मतदानाला अनुपस्थित राहिले. आवश्यक संख्याबळापेक्षा ५४ मते कमी पडल्याने हे विधेयक नामंजूर करण्यात आले.
राहुल गांधींचा ‘वर्मा’वर बोट ठेवत हल्लाबोल
विधेयक फेटाळले गेल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “हे विधेयक महिलांना आरक्षण देण्यासाठी नव्हतेच, तर संविधानाला पायदळी तुडवण्यासाठी रचलेला हा एक घाट होता.” प्रियांका गांधी यांनीही या अपयशावरून सरकारला धारेवर धरले आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने “विरोधकांनी महिलांच्या हक्काचा आणि सन्मानाचा अपमान केला आहे,” अशी टीका करत हा मुद्दा जनतेत नेण्याचे संकेत दिले आहेत.
दोन दिवस चाललेल्या या चर्चेत विरोधकांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर तीव्र आक्षेप घेतला. यामुळे दक्षिण भारतातील राज्यांच्या लोकसभेतील जागा कमी होऊन त्यांच्यावर अन्याय होईल, असा मुद्दा मांडण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांनी “सर्व राज्यांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचे लेखी आश्वासन देतो,” असे सांगून विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “गेल्या ११ वर्षांचा अनुभव पाहता आम्ही या सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही,” असा पलटवार अखिलेश यादव यांनी केला.
निवडणुकीत नवा ‘नॅरेटिव्ह’ सेट होणार?
विधेयक पडल्यामुळे आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आगामी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप या घटनेचा राजकीय वापर करण्याची शक्यता आहे. “विरोधकांनी महिला आरक्षणाला कशाप्रकारे खीळ घातली,” हा प्रचार भाजपच्या वतीने केला जाऊ शकतो. आता या राज्यांमधील जनता कोणाच्या बाजूने कौल देते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post