मुंबई । राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला अल्प दरात जेवण देणारी शिवभोजन थाळी मागच्या काही काळापासून बंद पडली आहे. मात्र आता ‘शिवभोजन केंद्रां’बाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच या केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक असल्याची माहितीही त्यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत विधानपरिषद सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिले असून राज्यातील ४२ पैकी ४१ शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे; तसेच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे, तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरगुती गॅस पुरवठ्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना पुरवठा केला जात आहे. राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांचा कारभार सुरळीत सुरू राहावा यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे; तसेच लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असेही मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post