मुंबई\जळगाव । राज्यात सध्या उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिक करत आहेत. राज्याच्या विविध भागांत तापमानाचा पारा वाढलेला असतानाच, हवामान विभागाने (IMD) आज १८ एप्रिल रोजी १४ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा तडाखा तीव्र असून, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात उन्हाची तीव्रता सर्वाधिक असून अमरावती, अकोला आणि नागपूरसह वाशिम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला असून, तूर्त पावसाची कोणतीही शक्यता नाही.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र: उष्णता अन् वादळाचा इशारा
मराठवाडामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. येथे तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये मात्र वादळी पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रमधील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा कडाका कायम असतानाच, १९ एप्रिल रोजी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगावातही उन्हाचा प्रभाव तीव्र आहे. दरम्यान आजपासून आगामी दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र व कोकण: पावसाची हजेरी
पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हवामानात मोठे बदल होत आहेत. सोलापूरमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात मुंबई-ठाण्यासह सिंधुदुर्गात उष्ण आणि दमट हवामान असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.















Discussion about this post