मुंबई । राज्याच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे वारे वाहत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) रायगड जिल्ह्यात मोठा खिंडार पडला आहे. रायगड मनसेमधील जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेले नाराजी नाट्य आता थेट बंडखोरीत रूपांतरित झाले आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या समर्थनार्थ तब्बल ५५ पदाधिकाऱ्यांनीही पक्षपदांचे सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड मनसे जिल्हाध्यक्षपदासाठी संदीप ठाकूर हे प्रमुख इच्छुक मानले जात होते. मात्र, पक्षाने त्यांना डावलून रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर पक्षात तीव्र नाराजी पसरली होती. माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. अखेर, संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर एकाच वेळी ५५ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे रायगड मनसेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजीनामा दिल्यानंतर संदीप ठाकूर यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या भेटीमुळे ठाकूर हे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जरी ठाकूर यांनी ही भेट केवळ ‘कौटुंबिक’ असून याचा राजकारणाशी संबंध नसल्याचा दावा केला असला, तरी राजकीय जाणकारांच्या मते त्यांचे मनसे सोडून शिवसेनेत जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे.















Discussion about this post