जळगाव । सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. वाढती गर्दी आणि आरक्षणाचा ताण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने भुसावळ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे तसेच साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वेच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 09050 भुसावळ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे आणि गाडी क्रमांक 09049 दादर-भुसावळ साप्ताहिक विशेष रेल्वे यांचा परिचालन कालावधी 25 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे. यापूर्वी या गाड्या 31 जुलैपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. मात्र प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि मोठी मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही दिशांनी मिळून एकूण 16 अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार आहेत.
मुंबईकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच शासकीय कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय विशेष लाभदायक ठरणार आहे. सणासुदीच्या काळात आरक्षणासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन प्रवाशांना अधिक सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही पश्चिम रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष रेल्वे 9 आणि 16 ऑगस्ट रोजी धावणार असून, बिकानेर–साईनगर शिर्डी विशेष रेल्वे 8 आणि 15 ऑगस्ट रोजी चालविण्यात येणार आहे. या मार्गावर प्रवाशांसाठी एकूण चार अतिरिक्त विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच धावतील. या अतिरिक्त फेऱ्यांसाठी आरक्षणाची सुविधा संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ झाल्याने नियमित गाड्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, सणासुदीच्या काळात हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post