जळगाव: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात होणारी घसरण थांबली असून, आता बाजारात पुन्हा ‘तेजी’ परतली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १३ हजार रुपयांची अवाढव्य वाढ झाली आहे.
जळगाव शहरातील सराफ बाजारात बुधवारी चांदीच्या भावात ५ हजार रुपयांची वाढ झाली होती, तर आज पुन्हा ८ हजार रुपयांची भर पडली. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चांदी तब्बल १३ हजार रुपयांनी महागली आहे. सोन्याच्या दरातही बुधवारी २ हजार २०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आज आणखी दीड हजार रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.
दरम्यान, १७ मेपासून अधिक मासाला सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीत अधिक मासात सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे आगामी काळात सुवर्ण बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरवाढीमुळे ग्राहक संभ्रमात असले तरी गुंतवणुकीसाठी अनेक जण अजूनही सोने-चांदीकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत.















Discussion about this post