मुंबई : NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ झालेल्या CJP आंदोलनावरून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आंदोलनाच्या आड काही राजकीय पक्ष आणि गुंडांनी स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. खरे विद्यार्थी आणि आंदोलनाच्या नावाखाली दंगामस्ती करणाऱ्यांमध्ये फरक केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, CJP आंदोलनात अटक झालेल्यांमध्ये अनेकांचा शाळा किंवा महाविद्यालयांशी कोणताही संबंध नव्हता. अशा व्यक्ती आंदोलनात का सहभागी झाल्या, हा गंभीर प्रश्न असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, आंदोलनात सहभागी झालेले प्रामाणिक विद्यार्थी आणि केवळ दगडफेक, वाहनांची तोडफोड व दंगामस्ती करण्यासाठी आलेले लोक यांच्यात फरक आहे. विद्यार्थ्यांबाबत सरकार आणि गृहखाते योग्य निर्णय घेईल. मात्र कायदा हातात घेणाऱ्यांना सोडण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अलामट्टी धरणाच्या उंचीवरही भूमिका स्पष्ट
अलामट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या प्रश्नावर बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूरसारख्या भागांना पुराचा मोठा फटका बसतो. केंद्र सरकारने धरणाची उंची वाढविण्यास अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीही या निर्णयाला विरोध केला असून राज्याची भूमिका केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
CET आणि MPSC पेपरफुटीविरोधात आंदोलन
दरम्यान, महाराष्ट्रातील CET आणि MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने यवतमाळ जिल्ह्यातील मांगुल येथे टॉवरवर चढून आंदोलन केले. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.















Discussion about this post