नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचा अखेर अत्यंत धक्कादायक शेवट झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागणार अशी दाट शक्यता असताना, ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला आहे. पक्षनेतृत्वाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे छगन भुजबळ अत्यंत नाराज असून, त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आल्यामुळे छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी आता उघडपणे आपली नाराजी आणि विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला शहरात समर्थकांनी ठिकठिकाणी आक्रमक पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर “साहेब, निर्णय घ्या” असा थेट आणि गर्भित इशारा देण्यात आला आहे. ऐन राजकीय धामधुमीत लागलेल्या या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून भुजबळ आता काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतून भुजबळांचा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला?
मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष सुरुवातीला छगन भुजबळ यांनाच राज्यसभेत पाठवण्यास अनुकूल होता. मात्र, पक्षांतर्गत बैठकीत भुजबळ यांनी पक्षासमोर एक मोठी अट ठेवली होती. आपले पुतणे समीर भुजबळ यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद दिले, तरच आपण राज्यसभेत जाऊ, असे भुजबळांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी नेतृत्वाने हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीपर्यंत पोहोचवला. मात्र, दिल्लीतील हायकमांडने हा प्रस्ताव साफ फेटाळून लावला. “फक्त एका व्यक्तीसाठी मंत्रिमंडळ विस्तार किंवा विशेष शपथविधी करणे शक्य नाही,” असे दिल्लीतून स्पष्ट सांगण्यात आल्यामुळे भुजबळांची कोंडी झाली आणि पर्यायाने पक्षाला राजेंद्र जैन यांच्या नावाचा विचार करावा लागला.
या सर्व नाट्यमय घडामोडींवर आणि नाराजीच्या चर्चांवर स्वतः छगन भुजबळ यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. “मला लोकसभा आणि राज्यसभेत जाण्याची इच्छा होती, हे सत्य आहे. यापूर्वीही अनेकदा संधी अगदी जवळ आली, पण शेवटच्या क्षणी ती मिळाली नाही,” असे म्हणत भुजबळांनी आपली खंत बोलून दाखवली. मात्र, भुजबळांनी संयम राखला असला तरी त्यांच्या समर्थकांचा रोष आता नियंत्रणाबाहेर गेला असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह यामुळे चव्हाट्यावर आला आहे.















Discussion about this post