केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाऊ गोपाळ जोशी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कर्नाटकातील धारवाड येथे एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर गोपाळ जोशी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वाद, मानसिक आणि शारीरिक छळासह लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण नगर येथील रहिवासी रमा कुलकर्णी यांनी गोपाळ जोशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर धारवाडमधील विद्यागिरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीत गोपाळ जोशी यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचेही तक्रारदार महिलेने म्हटले आहे.
२५ मे रोजी मालामड्डी येथील एका अपार्टमेंटमध्ये गोपाळ जोशी यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, विद्यागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भावाविरोधात थेट FIR दाखल झाल्याने या प्रकरणाला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून, तपासातून नेमके काय समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post