महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर गावात नीट (NEET) परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकिता सांगळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकिताचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी ती दीर्घकाळापासून नीट परीक्षेची तयारी करत होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिला १६६ गुण मिळाले. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती.
रविवारी संध्याकाळी अंकिता अभ्यास करण्यासाठी घरातील स्वतंत्र खोलीत गेली. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा उघडला असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
अंकिताने आत्महत्येपूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने आई-वडील आणि भावाचे आभार मानत, “माझ्या जीवन संपवण्यासाठी तुम्ही जबाबदार नाही. तुम्ही मला खूप प्रेम दिले, पण मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही,” असे म्हटले आहे. तसेच आई-वडिलांची काळजी घेण्याची विनंती भावाला करत सर्वांची माफीही मागितली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक ताण आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.















Discussion about this post