उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई । नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर, आज राजधानी मुंबईत मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संयुक्तपणे भव्य ‘तिरंगा मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) ते श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाला तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या ऐतिहासिक मार्चमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.
“गडकरी हे ‘खड्डामंत्री'”: उद्धव ठाकरेंचा टोला
मोर्च्यानंतर आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांवर चौफेर हल्लाबोल केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख त्यांनी थेट “खड्डामंत्री” असा करताच सभेत एकच हशा पिकला.
केंद्रातील इतर मंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले, “केंद्रीय अर्थमंत्री देशातील वाढत्या महागाईवर अवाक्षरही बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे सांगण्यात त्या व्यस्त आहेत. देशाच्या संरक्षणाची पुरती बोंब झालेली असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे धर्मेंद्र प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे धावून आले होते. तर आपले ‘खड्डामंत्री’ आणि रस्तामंत्री हे सध्या इथेनॉलवर बोलत आहेत.”
पंतप्रधान मोदींना इशारा देताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मोदीजी, तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून हटवताना तुम्हाला जितक्या यातना झाल्या असतील, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक वेदना नीट पेपरफुटीमुळे ज्या निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पालकांना झाल्या आहेत.”
आता पुढचा लढा ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात!
नीट प्रकरणातील यशानंतर आता विरोधकांनी आपला मोर्चा E20 (इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या मुद्द्याकडे वळवला आहे. सभेतून स्पष्ट संकेत देत उद्धव ठाकरे यांनी यापुढील आंदोलन इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात असेल, अशी घोषणा केली. E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज घटले असून वाहनांचा देखभाल खर्च प्रचंड वाढला आहे, तसेच इंजिनच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
४ ऑगस्ट रोजी संसदेवर धडकणार मोर्चा
दरम्यान, दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने देखील E20 पेट्रोलच्या अघोषित सक्तीविरोधात येत्या ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी वाहनधारकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा आता विरोधकांच्या अजेंड्यावर अग्रक्रमावर असल्याचे स्पष्ट केले आहे.














Discussion about this post