नवी दिल्ली । नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी देशभरात संतापाची लाट असतानाच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आगामी राष्ट्रीय राजकारणाची दिशा स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.
“NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे.”
असे कौतुक करत पवारांनी हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच, युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ देणाऱ्या विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे आभार मानत, “देशातील लोकशाहीने कात टाकली आहे,” असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग
या हाय-व्होल्टेज राजकीय घडामोडींमुळे नरेंद्र मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याची चर्चा रंगली आहे. केंद्रातील या राजीनाम्यामागोमाग महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे. या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. या राजकीय उलथापालथीमुळे आगामी काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेमके काय समीकरणे जुळणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.















Discussion about this post