नवी दिल्ली । नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला मोठे यश आले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर एकच जल्लोष पाहायला मिळाला.
राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना CJP चे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले की, “आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा जिंकेपर्यंत ताकदीने लढलो. हे लोक आधी म्हणायचे की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण आपण सर्व विद्यार्थ्यांनी हे शक्य करून दाखवले.”
यावेळी बोलताना अभिजित दीपके यांनी काही महत्त्वाचे मुद्दे व मागण्या सरकारसमोर मांडल्या. या संपूर्ण प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांनी नैराश्येतून किंवा इतर कारणांमुळे आत्महत्या केल्या, त्या सर्व पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर गुंडगिरी करत अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांनी वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला होता, त्यांच्यावरही कारवाईची मागणी दीपके यांनी केली. २० जुलैनंतर आंदोलक विद्यार्थ्यांवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि ज्या कायदेशीर कारवाया झाल्या आहेत, त्या सर्व तात्काळ मागे घेण्यात याव्यात.















Discussion about this post