मुंबई । एका दिवसाच्या विश्रांतीनंतर अखेर मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र पूर्णपणे व्यापला आहे. सोमवारपासून दक्षिण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने राज्यातील २६ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.मान्सूनच्या या आगमनामुळे कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आ.
मान्सूनचा प्रवास कसा असेल?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून सध्या तळकोकणातील रत्नागिरी आणि हरणाईपर्यंत पोहोचला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. मान्सूनने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांमध्येही प्रवेश केला आहे. मान्सूनची गती संथ असली तरीही येत्या २ ते ३ दिवसांत तो महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, येत्या २ ते ३ दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
आज (ता. ९) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार सरींची तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया.















Discussion about this post