मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नाराजी आणि बंडखोरीचे पडसाद उमटत असतानाच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुती टिकवायची की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगत महाजन यांनी सत्तार यांना संयम राखण्याचा सल्ला दिला.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीत अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे दिसून आले. भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अब्दुल सत्तार यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, “अब्दुल सत्तार हे शिवसेनेतील वरिष्ठ नेते आहेत. मात्र महायुतीसारख्या संवेदनशील विषयांवर बोलताना जबाबदारीने भूमिका मांडली पाहिजे. ते तर आता युती ठेवायची की नाही यावर विचार करायला लागले आहेत. मला वाटतं ते सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत. आपण लहान तोंडी मोठा घास कशाला घ्यायला पाहिजे.
आपण आपल्यापुरतं बोला, जिल्ह्यापुरतं बोला. युती ठेवायची की नाही भाजपशी हा आता मला विचार करावा लागेल सत्तार असं बोलत आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी असं बोलू नये असा माझा त्यांना सल्ला आहे.’ असं ते म्हणाले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून नाराजीचे सूर उमटत असून महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे आगामी काळात या नाराजीचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post