जळगाव । जळगाव शहरात शांतता भंग करणाऱ्या आणि बुलेटच्या कर्कश आवाजाने नागरिकांना, विशेषतः रुग्ण व वृद्धांना त्रस्त करणाऱ्या वाहनचालकांना जळगाव पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, जप्त करण्यात आलेल्या १०० कर्कश सायलेन्सर आणि २५० बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट्सवर थेट रोड रोलर फिरवून त्यांचा कायमचा नायनाट करण्यात आला.
वाढत्या ध्वनिप्रदूषणाने नागरिक हैराण झाले होते. अनेक तरुणांनी आपल्या दुचाकींचे मूळ सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवले होते. अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून पोलिसांनी हे साहित्य जप्त केले होते. आज या सर्व साहित्याचा सार्वजनिकरीत्या रोड रोलरखाली चक्काचूर करण्यात आला, ज्यामुळे अशा फॅन्सी बदलांना आळा बसेल.
ही कठोर मोहीम राबवण्यामागे जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात हे मुख्य कारण आहे. २०२५ मध्ये जिल्ह्यात ९३९ अपघात झाले, ज्यामध्ये ४८७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तब्बल ४५० अपघात हे प्राणांतिक ठरल्याने पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले की, जळगाव जिल्ह्यात अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी ‘शून्य प्राणहानी’ (Zero Death) हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.















Discussion about this post