पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे यंदा निकाल लांबणीवर जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पदोन्नती आणि बदल्यांच्या नियमात झालेल्या बदलामुळे कर्मचारी संतप्त झाले असून, त्याचा थेट परिणाम आता निकालाच्या कामकाजावर होताना दिसत आहे.
नेमका वाद काय?
शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा कालावधी दोन वर्षांवरून थेट चार ते सहा वर्षांवर नेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता हा एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या निषेधार्थ राज्यातील नऊही विभागीय मंडळांमध्ये सध्या लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू आहे.
२८ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
सध्या सुरू असलेल्या लाक्षणिक आंदोलनानंतर, आता २८ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णतः कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. बोर्ड कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष विठ्ठल सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनामुळे निकालाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.
निकालाच्या वेळापत्रकात बदल होणार?
साधारणपणे बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असतो. मात्र, आंदोलनामुळे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, गुण नोंदणी आणि इतर तांत्रिक कामे थांबली आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित असलेली निकालाची लगबग आता लांबणीवर जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.















Discussion about this post