आज देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. याच दरम्यान दिल्लीत इंडिया आघाडीची मोठी बैठक पार पडली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक पार पडली. दरम्यान यावेळी लोकसभेत इंडिया आघाडी किती जागा जिंकेल? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की इंडिया आघाडी देशात 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल. बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खरगे असं म्हणाले आहेत.
या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, शरद पवार, जितेंद्र आव्हाड, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चढ्ढा, द्रमुकचे टी.आर. बालू, आरजेडीकडून तेजस्वी यादव आणि संजय यादव, जेएमएमकडून चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सकडून फारूख अब्दुल्ला, सीपीआयकडून डी. राजा, सीपीआय(एम) कडून सीताराम येचुरी आणि शिवसेनेकडून अनिल देसाई (ठाकरेगट) उपस्थित होते.
या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत की, ”आज आमची इंडिया आघाडीची बैठक पार पडली. दीड तास आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. निवडणुका आणि मतमोजणीवेळी येणाऱ्या गोष्टींवर चर्चा केली. कार्यकर्त्यांना कोणत्या सूचना दिल्या पाहिजे, त्यावरही चर्चा झाली.”
ते म्हणाले, ”आम्ही आधीच कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. आज सर्वांनी एकत्र आम्ही चर्चा केली. भाजप आणि त्यांचे सहकारी आज एक्झिट पोलची चर्चा करतील. ते जो नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतील, त्याची खरी माहिती आम्ही लोकांना सांगणं गरजेचं आहे.”















Discussion about this post