यावल । यावल तालुक्यातील कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावरील तरुणाच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले असून, हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मित्रांनीच दारूच्या नशेत झालेल्या वादातून 26 वर्षीय तरुणाची हत्या करून अज्ञात वाहनाच्या अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव पवन रवींद्र सोळंके (वय 26, रा. कोळन्हावी) असे आहे. घटनेनंतर संशयितांनी पवनचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाल्याचे सांगत त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यासंदर्भात पोलिसांत अपघाताची फिर्यादही देण्यात आली होती. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमांचे स्वरूप संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन आणि गुन्हे शोध पथकाने सखोल तपास सुरू केला. चौकशीदरम्यान संशयितांच्या जबाबात विसंगती आढळून आली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पवन आणि त्याचे मित्र यांनी रात्री शेतात मद्यपानाची पार्टी केली होती. त्यानंतर काही जण घरी परतले; मात्र पवन सोळंके, उमेश परदेशी, चेतन कोळी आणि लोकेश महाजन हे पुढे किनगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे मद्यपानादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात तिघांनी पवनला निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.
गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह रस्त्यालगत टाकून अपघाताचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासापुढे हा कट टिकू शकला नाही. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
या प्रकरणी उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी आणि लोकेश दिवाकर महाजन (दोघे रा. डांभुर्णी) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलिस करीत आहेत.















Discussion about this post