मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित खासदार गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यानंतर या खासदारांकडून स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया सुरू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असून, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची भावना या खासदारांमध्ये असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, या घडामोडींची माहिती मिळताच ठाकरे गट अलर्ट मोडवर गेला आहे. पक्षाने कायदेशीर सल्लामसलत सुरू केली असून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्व खासदारांना बैठकीस उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.
या संभाव्य फुटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत दिल्लीतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post