सिक्कीममध्ये सुरू असलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला असून पाच जण अजूनही मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिक्कीममधील नामची जिल्ह्यात समरदुंग-झोलुंगे परिसरात एनएचपीसीच्या स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पासाठी बोगद्याचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी अचानक बोगद्यामध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर मोठा भाग कोसळला. त्या वेळी आत एकूण २७ कामगार आणि कर्मचारी कार्यरत होते. यापैकी दोन जणांनी बाहेर पडण्यात यश मिळवले, मात्र उर्वरित २५ जण मलब्याखाली अडकले.
दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत २० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी १३ जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये उत्तर बंगालमधील ११ कामगारांचा समावेश आहे. तसेच पंजाब आणि सिक्कीममधील प्रत्येकी एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. अद्याप पाच जणांचा शोध सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बेपत्ता असलेल्यांमध्ये केरळमधील ४३ वर्षीय भूगर्भशास्त्रज्ञ अनिश मोहन यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विषारी वायू आणि मोठ्या प्रमाणातील ढिगाऱ्यामुळे शोध मोहिमेला अडथळे येत असले तरी बचाव पथके सतत प्रयत्न करत आहेत.एनएचपीसीच्या प्राथमिक माहितीनुसार, बोगद्यातील खडकांच्या थरांमध्ये साचलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्याने धूर आणि विषारी वायू तयार झाला. त्यानंतर बोगद्याचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली. घटनेनंतर तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली.
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग यांनी या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.















Discussion about this post