मुंबई । राज्यातील हवामानात सध्या तीव्र चढ-उतार पाहायला मिळत असून नागरिकांसह शेतकरीही मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून उष्णतेने कहर केला असून अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये ४० अंशांच्या पुढे तापमानाची नोंद झाली.
याच दरम्यान, भारतीय हवामान विभाग यांनी मोठा इशारा देत पुढील दोन दिवसांत राज्यात मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आधीच उष्णतेने हैराण झालेल्या राज्यावर आता दुहेरी संकट कोसळण्याची चिन्हे आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हाताशी आलेली पिकेही नष्ट झाली. आता पुन्हा गारपिटीचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मराठवाडा आणि काही किनारपट्टी भागांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी भागातही हवामान बिघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी रात्री मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान खात्यानं आगामी दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सतत बदलणाऱ्या या हवामानामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.















Discussion about this post