नवी दिल्ली । लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. “हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नसून, केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी रचलेला एक राजकीय कट आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. राहुल गांधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
राहुल गांधी यांनी दावा केला की, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकात आता केले जाणारे बदल हे दलित, आदिवासी आणि ओबीसी समुदायांचे हक्क हिरावून घेणारे आहेत. “आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये जे प्रयोग केले गेले, तेच आता संपूर्ण देशात राबवून निवडणूक नकाशा बदलण्याचा घाट घातला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. हे विधेयक प्रगतीच्या आड येणारे असून यामुळे दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये भेदभाव निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सरकारवर टोलेबाजी करताना राहुल गांधी यांनी एका जादुगाराची गोष्ट सांगितली. “सरकार सध्या घाबरलेले असून आपल्या चुका लपवण्यासाठी एखाद्या जादुगारासारखे नवे डावपेच आखत आहे. पण एका चुकीमुळे जशी जादुगाराची जादू संपते, तशीच अवस्था या सरकारची झाली आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, सरकार केवळ बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
आपल्या भाषणाच्या शेवटी राहुल गांधी भावूक झाले. त्यांनी आपली आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. “माझ्या आजीने मला सांगितले होते की, खरी ताकद ती असते जी नम्रपणे काम करते आणि स्वतःचे प्रदर्शन करत नाही,” असे सांगत त्यांनी सरकारला अहंकार सोडून लोकशाही मूल्यांचा आदर करण्याचा सल्ला दिला.















Discussion about this post