राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून अनेक भागांमध्ये पिकांना पाण्याची गरज भासत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अंदाज समोर आला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.
डख यांच्या अंदाजानुसार, 7, 8 आणि 9 सप्टेंबरदरम्यान राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या उघडिपीसह कडक ऊनही पाहायला मिळू शकते. त्यामुळे संपूर्ण राज्यातून पाऊस पूर्णपणे माघार घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

13 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार?
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांनी 13 सप्टेंबरपर्यंत शेतीची रखडलेली कामे पूर्ण करून घेण्याचा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसामुळे आतापर्यंत कमी पाऊस झालेल्या भागांना मोठा फायदा होऊ शकतो, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
परतीचा पाऊस महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्याची शक्यता असून गणेशोत्सवाच्या काळातही पावसाचा जोर कायम राहू शकतो, असे डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

देशातील 20 राज्यांना पावसाचा इशारा
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत देशातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सुमारे 20 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, आसाम आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना, आता सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण आणि त्याचा कालावधी किती राहतो, यावर खरीप पिकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.















Discussion about this post