जामनेर | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यात पोलिस आणि कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत अनधिकृत कापूस बियाण्यांचा मोठा साठा उघडकीस आणला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून अवैधरित्या बियाण्यांची विक्री करण्याच्या संशयावरून तब्बल ९ लाख १५ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जामनेर शहरातील साईनगर परिसरातील एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस बियाण्यांचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार टाकण्यात आलेल्या छाप्यात घरातून ४० गोण्या आणि १,०१६ बियाण्यांची पाकिटे आढळून आली.
तपासादरम्यान संबंधित व्यक्तीकडे बियाण्यांच्या साठवणुकीसाठी किंवा विक्रीसाठी आवश्यक असलेला परवाना नसल्याचे समोर आले. तसेच बियाण्यांची खरेदी, पुरवठादार आणि विक्रीबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने संशय अधिक बळावला.
जप्त केलेल्या साठ्यात ‘दिया-५९’ या वाणाची ४५० पाकिटे आणि ‘क्रीश-४५’ या वाणाची ५६६ पाकिटांचा समावेश असून, त्यांची एकूण बाजारमूल्य ९ लाख १५ हजार ४१६ रुपये इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारची अनधिकृत किंवा निकृष्ट दर्जाची बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणी दीपक राजमल चौधरी (रा. साईनगर, जामनेर), गुलाब आधार पाटील, शेषराव पाटील (रा. वर्दी, ता. पाचोरा) तसेच इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट आणि अनधिकृत बियाण्यांच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post