मुंबई । सर्वसामान्य वाहनधारकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तब्बल ५ रुपयांची मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यपूर्वेतील (पश्चिम आशिया) वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला बसू लागला असून, त्याचे पडसाद भारतातही उमटण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याचा मोठा फटका भारतातील सरकारी तेल कंपन्यांना बसत असून त्यांचा तोटा वाढला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांकडून आगामी काळात प्रतिलिटर ५ रुपयांपर्यंत दरवाढ केली जाऊ शकते, असा इशारा ICRA आणि CRISIL या आघाडीच्या संस्थांच्या विश्लेषणातून देण्यात आला आहे.
RBI कडूनही महागाई वाढण्याचा इशारा!
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ५ जून २०२६ रोजी मौद्रिक धोरण जाहीर करताना रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मात्र, पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पुरवठा साखळीवर दबाव निर्माण होऊन महागाई वाढण्याचा मोठा धोका त्यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर RBI ने चालू आर्थिक वर्षासाठीचा किरकोळ महागाईचा अंदाज ४.६ टक्क्यांवरून थेट ५.१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
सध्या किमती स्थिर, पण…
मागील मे महिन्यात अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ करण्यात आली होती. २५ मे २०२६ रोजी झालेल्या शेवटच्या दरवाढीनंतर मात्र आज, ६ जूनपर्यंत देशातील इंधन दर स्थिर आहेत. सध्या जरी वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळालेला असला, तरी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर मध्यपूर्वेतील तणाव असाच राहिला, तर कच्च्या तेलाचा भडका उडून देशांतर्गत इंधन दरात कधीही मोठी वाढ होऊ शकते.















Discussion about this post