जळगाव | नियतीचे खेळ खरोखरच अनाकलनीय असतात. ज्या घरात अवघ्या 10 दिवसांवर लग्नाचा सनई-चौघडा वाजणार होता, त्या घरात आता काळाने घाला घातला आहे. वणी येथील सप्तशृंगी गडावर लग्नाची पत्रिका देवीच्या चरणी अर्पण करून परतत असताना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात लग्नाचं बाशिंग बांधण्यापूर्वीच नववधूसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.
टायर फुटल्याने कार थेट झाडावर धडकली
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील शिखा विनायक बेलसरे हिचा विवाह ८ मे रोजी होणार होता. २१ एप्रिल रोजीच तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. लग्नाचे पहिले निमंत्रण देण्यासाठी शिखा आपल्या कुटुंबासह वणी गडावर गेली होती. २९ एप्रिल रोजी परतत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास बांबरुड परिसरात त्यांच्या भरधाव कारचे टायर अचानक फुटले. यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याखाली उतरून थेट एका झाडावर जाऊन आदळली.
नवरीचा आणि वहिनीचा जागीच मृत्यू
हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. यामध्ये वाग्दत्त वधू शिखा विनायक बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या बहिणीचे कन्यादान करायचे स्वप्न डोळ्यांत होते, त्याच बहिणीला डोळ्यांदेखत जाताना पाहण्याची दुर्दैवी वेळ तिच्या भावांवर आली. या घटनेत शिखाचे दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
८ मे रोजी होतं लग्न; आनंदाच्या जागी शोककळा
शिखाच्या लग्नाची जय्यत तयारी दोन्ही कुटुंबात सुरू होती. पाहुण्यांना निमंत्रण देणं आणि लग्नाचे विधी ठरवणं सुरू असतानाच ही धक्कादायक बातमी धडकली. १० दिवसांनंतर ज्या घरातून नवरीची पाठवणी होणार होती, तिथे आता अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
बापाचा हंबरडा अन् सुन्न जळगाव
मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेले वडील विनायक बेलसरे यांचा आक्रोश पाहून जिल्हा रुग्णालयातील उपस्थितांचेही डोळे पाणावले. “माझ्या लेकीचं लग्न होतं साहेब, पत्रिका ठेवून येत होती ती…” असा हंबरडा फोडत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.















Discussion about this post