मुंबई । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या घडामोडींना ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले जात असतानाच आता ‘ऑपरेशन तुतारी’चीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
शिवसेना ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडे आता केवळ तीन खासदार उरले आहेत. तर शिंदे गटाच्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंड झालेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा आणि पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस-सोनवणे भेटीनंतर चर्चांना उधाण
दरम्यान, ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांमध्ये भर पडली ती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीमुळे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना पक्षातील खासदार फुटणार नसल्याचा ठाम दावा केला.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, “खासदारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही. भाजपला भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेसाठी आणखी खासदारांची गरज असू शकते, पण आमच्या पक्षात अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होणार नाही.”
बजरंग सोनवणे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, “विलास घुले हत्या प्रकरणात त्यांच्या मुलावर झालेले आरोप आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली जबाबदारी यामुळे त्यांनी ही भेट घेतली असावी.”रोहित पवार सध्या शेतकरी कर्जमाफीसंदर्भात जनजागृती दौऱ्यावर असून, बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ होण्याची शक्यता फेटाळून लावली















Discussion about this post