नंदुरबार । भाजीच्या कॅरेटच्या आडून ‘पुष्पा’ चित्रपटाच्या स्टाईलने वन्य प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न नंदुरबार पोलिसांनी उधळून लावला आहे. महाराष्ट्रातून गुजरातकडे वन्य प्राण्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळ सापळा रचून एका आयशर ट्रकमधून भारतीय कोल्हे, तीतर आणि जंगली पोपटांची होणारी अवैध वाहतूक रोखली. या कारवाईत पोलिसांनी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.
मालेगावहून गुजरातच्या दिशेने एका आयशर ट्रकमध्ये वन्य प्राणी नेले जात असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विसरवाडी पोलीस आणि वनविभागाच्या मदतीने सुरत-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रात्री ८ वाजेच्या सुमारास कडक नाकेबंदी करण्यात आली. संशयित आयशर ट्रक येताच पोलिसांनी तो थांबवून झडती घेतली.
भाजीच्या कॅरेटचा आडोसा, आत मात्र पिंजरे!
तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे शक्कल लढवली होती. ट्रकमध्ये मागच्या बाजूला वरच्या थरात भाजीपाला भरलेले कॅरेट रचले होते, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मात्र, पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता, या कॅरेटच्या आड लोखंडी पिंजऱ्यांमध्ये वन्य प्राणी क्रूरपणे कोंडलेले आढळले.
या कारवाईत पाच भारतीय कोल्हे, १९० तितर आणि ९५ जंगली पोपट जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोल्ह्यासारख्या हिंस्त्र आणि दुर्मिळ प्राण्यांची तस्करी नेमकी कशासाठी आणि कोणाला केली जात होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.















Discussion about this post