जळगाव | गेल्या दीड महिन्यापासून कडक उन्हाने होरपळणाऱ्या जळगावकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. सातत्याने ४० अंशांच्या पुढे असलेले तापमान रविवारी ३९.५ अंशांवर घसरल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. विशेष म्हणजे तब्बल ४९ दिवसांनंतर शहराचा कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या खाली आला आहे.
मे महिनाभर जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळाला. अनेक दिवस तापमान ४२ ते ४५ अंशांच्या दरम्यान राहिल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत होते, तर उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. मात्र शनिवारी शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण तयार झाल्याने आणि ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने तापमानात लक्षणीय घट झाली.
हवामानातील या बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आगामी काही दिवस आणखी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने १ आणि २ जून रोजी जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्री-मान्सूनच्या हालचाली सक्रिय झाल्यामुळे जिल्ह्यात हवामानात बदल होत आहे. ३ जूननंतरही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून ४ आणि ५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
दरम्यान, पावसाच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याने पुढील काही दिवसांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगावकरांसाठी उकाड्याच्या त्रासातून मिळालेला हा दिलासा मान्सूनच्या स्वागताची नांदी मानला जात आहे.















Discussion about this post