जळगाव: जळगाव शहरातील एटीएम केंद्रांवर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष विचलित करून, हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी धुळे येथून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून २ लाख ३१ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे. तर त्याचा मुंबईचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अशी उघडकीस आली फसवणूक?
२६ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएममध्ये एक तक्रारदार पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एटीएम केंद्रात दबा धरून बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांचे मूळ एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून दुसरे कार्ड त्यांच्या हातात टेकवले.
तक्रारदाराचा पिन नंबर (PIN) चोरून पाहिल्यामुळे आरोपीने या कार्डचा वापर करून धुळे, नंदुरबार आणि मालेगाव अशा विविध शहरांतील एटीएममधून तक्रारदाराच्या खात्यातून एकूण २ लाख ३१ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली होती. याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी धुळे येथे सापळा रचून शेख हबीब शेख नवाब (वय ५४, रा. लाला सरदार नगर, धुळे) या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्यात सहभागी असलेला शेख हबीबचा दुसरा साथीदार सैय्यद कमालुद्दीन खान (वय ३५, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या फरार आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड मोठा असून त्याच्यावर मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील कांदिवली, कामोठे, कळंबोली, वाशी यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे १० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.













Discussion about this post