वर्धा । देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आंबेडकर शाळेजवळ भरधाव ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने तीन अल्पवयीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे हिंगणघाट शहरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी मृत मुलींची नावे आहेत. तिन्ही मुली स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना हा भीषण अपघात झाला. आंबेडकर शाळेजवळून दुचाकी जात असताना मागून आलेल्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी मुलींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिन्ही मुलींचा मृत्यू झाला.
स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहावर शोककळा
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच तीन शाळकरी मुलींचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी शहरात पसरताच हिंगणघाटमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निष्पाप मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघात नेमका कसा घडला याचा पोलीस तपास करत आहेत.














Discussion about this post