नवी दिल्ली । स्पर्धा परीक्षा आणि विविध प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या शुल्कामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंगची व्यवस्था उभारण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञानासह युवकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला.
कोचिंगचा खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शुल्काचे खासगी क्लासेस लावावे लागतात. त्यामुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारकडून मोफत ऑनलाइन कोचिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. डिजिटल सार्वजनिक सुविधांचा वापर, दर्जेदार शिक्षक आणि उपलब्ध तंत्रज्ञान यांना एकत्र आणून देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंगचे नेटवर्क तयार केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरापासून दूर जाऊन महागडे क्लासेस लावण्याची गरज कमी होईल, असा सरकारचा उद्देश आहे.
गरीब-मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा
कोचिंगसाठी दरवर्षी होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचवण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.ऑनलाइन माध्यमातून दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास देशातील विविध भागांतील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळण्यास मदत होईल.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI क्षेत्रातील कौशल्य विकासावरही भर दिला. आगामी एका वर्षात देशातील १ कोटी तरुणांना AI कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.AI क्षेत्राचा विस्तार होत असताना भारतातील तरुणांना या तंत्रज्ञानासाठी आवश्यक कौशल्ये मिळणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. यामुळे भविष्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.
भारतामध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारली जाणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्ये गुगल डेटा सेंटर उभारत असून, गुजरातमध्ये मेटा आणि रिलायन्सच्या माध्यमातून डेटा सेंटर उभारण्याची योजना असल्याचे मोदी यांनी नमूद केले. देशात तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार होत असताना त्याचा सर्वाधिक फायदा भारतीय तरुणांना मिळावा, यासाठी सरकार कौशल्य विकासावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.














Discussion about this post